पुणे : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
राजेश टोपे यांनी सांगितलं कि, “राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यानुसार आता पुण्यात सकाळी सात ते अकरा या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.”
‘पुणे मनपा हद्दीत शनिवार आणि रविवारीही अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु राहणार आहेत. किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असेल’, अशी प्रतिक्रिया पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी राज्यातील इतर जिल्ह्यामधील लॉकडाऊनच्या स्थितीबाबत सांगितलं की पॉझिटिव्हीटीचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती पाहून शिथिलता दिली जाणार आहे. याबाबतचे सविस्तर आदेश १ जून रोजी काढले जातील.




