पुणे : राज्यातील मास्क वापरण्याची सक्ती उठवण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. हे वृत्त धादांत खोटे आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते शनिवारी पु्ण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यामुळे या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला आहे.
अजित पवार यांनी म्हटले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्क लावायचा नाही, अशी चर्चा झालीच नाही. माध्यमांनी यासंदर्भात नीटपणे माहिती घेऊन बातमी द्यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरलाच पाहिजे, हा मुख्यमंत्र्यांसह आमचा आग्रह आहे. परदेशात इंग्लंडसारख्या देशांनी मास्क न वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांना लखलाभ आहे, मला त्यावर बोलायचं नाही. आपल्या राज्यात तशाप्रकारची चर्चाही नाही. तसा कोणताही निर्णय झालेला नाही. कृपा करुन लोकांमध्ये कोणतेही गैरसमज निर्माण करु नयेत, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले आहे.




