सांगली : सांगलीत काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत माहिती दिली आहे.
२० जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील ९ लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेने सांगलीसह संपूर्ण राज्य हादरलं होतं. दरम्यान, एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते, मात्र या प्रकरणात हत्येचा धागा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध देऊन मारल्याचे पोलीस तपासांत समोर आले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं असून याप्रकरणात १९ आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येच्या कममान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यातील २ आरोपींनी या कुटुंबातील सदस्यांना विषारी औषध दिलं. बाकी गोष्टी तपासात निष्पन्न होती, तपास सुरू आहे.
म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज होता. या सर्वांनी आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. पण आता पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली असून या ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे निष्पन्न झाले आहे.
सांगली हादरली! एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याची माहिती




