मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारकडून निर्बंध जारी करण्यात येणार आहेत. नव्या निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारकडून दोन नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार सोमवारपासून राज्यात व्यायामशाळा आणि ब्युटी पार्लर्स पूर्णपणे बंद असणार होती. तर सलून्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र रविवारी या नियमात बदल करण्यात आला. त्यानुसार आता जिम आणि ब्युटी पार्लर्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. मात्र, याठिकाणच्या कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ब्युटी पार्लर्स आणि जिम चालकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोणते निर्बंध लागणार?
- पहाटे 5 ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी
- अत्यावश्यक कारणांशिवाय रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी
- सरकारी कार्यालयांमध्ये व्हिजिटर्सना परवानगीशिवाय प्रवेश नाही.
- सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती बंधनकारक
- कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी
- विवाह सोहळ्याला फक्त ५० जणांना उपस्थित राहता येणार
- अंत्यविधीला २० जणांना उपस्थित राहता येणार
- राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ५० जणांची उपस्थिती
- शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील
- स्विमींग पूल्स, स्पा, वेलनेस सेंटर पूर्णपणे बंद राहणार
- केशकर्तनालय (सलून्स) सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालवता येणार
- नियोजित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना निर्बंधांतून सूट. खेळाडुंना बायो बबलमध्ये राहावे लागणार. प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहता येणार नाही. दर तीन दिवसांनी खेळाडुंची कोरोना चाचणी करणे बंधनकारक
- अम्युझमेंट पार्क, किल्ले आणि स्थानिक पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद राहतील.
- शॉपिंग मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येणार. मॉलमध्ये कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी
- हॉटेल्स आणि रेस्टारंटस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ५० टक्के क्षमतेने चालवता येणार.
- लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई होणार
- नाट्यगृह आणि सिनेमा थिएटर्स ५० टक्के क्षमतेने चालवता येणार. करोन लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच परवानगी. रात्री १० ते सकाळी ८ या काळात बंद ठेवावी लागणार.
- महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी पीसीआ चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक
- एमपीएससी, यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा दिली जाईल
- आंतरराष्ट्रीय विमानप्रवास केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार
- मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत, केवळ कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक
- लोकल ट्रेनवर कोणतेही निर्बंध नाहीत




