मुंबई : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राज्याची महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा समावेश होता. आता यात नव्याने 5 जिल्ह्यांचा समावेश करून 21 जिल्ह्यांत ही योजना व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत झालेल्या गैरव्यवहाराचा प्रश्न विधानसभा सदस्य माधवराव पवार यांनी उपस्थित केला होता.
मंत्री मुंडे म्हणाले की, या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील कामांबरोबरच पहिल्या टप्प्यात राहिलेली अर्धवट कामे देखील पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच या योजनेतील काही थकीत देयके असल्यास तीदेखील अदा करण्यात येतील, अशीही माहिती यावेळी मंत्री मुंडे यांनी दिली. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य राजेश टोपे, समीर कुणावार, नमिता मुंदडा, सुरेश वरपुडकर यांनी सहभाग घेतला.




