नगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा काही दिवस फरार होता. त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसर्मपण केले. दरम्यान, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबद्दल सतत दबाब टाकला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे हे काल रात्री भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यानंतर त्यांनी भगवान गडावरच मुक्काम केला. यावेळी रात्री उशीरापर्यंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची चर्चा झाली.
भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी
आता नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. नामदेव शास्त्री म्हणाले की, जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मुद्दाम धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवानगड आहे. आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे असल्याचेही नामदेव शास्त्री यांनी सांगितले. नामदेव शास्त्री पुढे म्हणाले की, मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत. तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे, यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. या प्रकरणाचा परिणाम वारकरी संप्रदायावर झाला आहे. ज्या लोकांना जातीयवाद माहिती नाही, त्यांना देखील आता कळाला. जे संत सामाजिक सलोखा निर्माण करतात, त्यांच्यामध्येही तेढ निर्माण झाल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. नामदेव शास्त्री यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.