मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांना सुनावण्यात आलेली ईडीची कोठडी आज संपली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी ईडीकडून संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणात चौकशीसाठी आणखी ईडीच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
३१ जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर राऊतांना ईडीने अटक केली होती. न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली. आज सुनावणी झाली असता त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास १० तास ईडीकडून चौकशी झाली.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा यापुढील मुक्काम आता मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. दरम्यान, संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता जामीनासाठी अर्ज करता येणार आहे. संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचं जेवण, औषधं घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलून घेण्यास सांगितलं आहे.




