मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सहा वाहने विचित्रपणे एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण आठजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने अनेक वाहने एकमेकांना धडकली. यात एक कार ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने तिचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातामध्ये जीव गमावलेल्यांमध्ये युवक काँग्रेसचे नेते गौरव खरात यांचाही समावेश आहे.
अपघातातील मृतांची नावे :
- गौरव खरात (वय ३६)
- सौरभ तुळसे (वय ३२)
- सिद्धार्थ राजगुरू (वय ३१)
- मयूर दयानंद कदम
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला MH 46 AR 3877 या कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे ही कार पुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन आदळली. या धडकेमुळे टेम्पो त्याच्यापुढे असणाऱ्या कारवर जाऊन आदळला. अशाप्रकारे दोन कंटेनर, दोन कार, एक ट्रक आणि एक आयशर टेम्पो या गाड्यांचा भीषण अपघात झाला. यावेळी एक कार कंटेनर आणि ट्रकच्या मध्ये सापडल्याने कारचा चुराडा झाला आणि त्यामधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी महाराष्ट्र सुरक्षा दल ,देवदूत रेस्क्यू टीम आणि खोपोली, खंडाळा, महामार्ग पोलीस दाखल झाले.




