मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) देण्यात आला आहे. एटीएसने हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आज महाराष्ट्र एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज एटीएसच्या पथकाने मनसुख हिरेन यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले. यावेळी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. तसेच या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानं केली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, आता याप्रकरणी कुटुंबियांच्या वतीनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकानं मनसुख हिरेन यांच्या घरी तब्बल साडेतीन तास चौकशी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवल्याची माहिती दिली. त्यानंतर एटीएसने याप्रकरणाचा तपास सुरु करत ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता, त्याठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. एटीएसचं पथक संपूर्ण परिसरातील cctv फुटेज देखील तपासात आहे.




