मुंबई : मुंबई विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. येथे एअर इंडियाच्या विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला आग लागली होती. टोइंग वाहनाला आग लागली तेव्हा विमानात 85 लोक होते. सुदैवाने या आगीमुळे विमान आणि त्यातील प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
आज दुपारी १ वाजेदरम्यान V26R स्टँडवर हा अपघात झाला. पुश बॅक ट्रॉलीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्यानंतर तात्काळ आग विझण्यात आली. 10 मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर विमानतळावरील कामकाज सामान्यपणे सुरु आहे. एअर इंडियाची फ्लाइट (AI-647) 85 जणांना घेऊन जामनगरला रवाना होणार होती. फ्लाइट नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशीरा निघाली.
पुश बॅक ट्रॉलीतून विमान टॅक्सीवेवरून धावपट्टीवर आणले जाते. त्याला जोडलेली एक रॉड विमानाच्या पुढच्या चाकाला जोडलेली असते. मग ते विमानाला धावपट्टीवर ढकलते. त्यानंतर ट्रॉली काढली जाते आणि विमान टेक ऑफसाठी धावपट्टीवर धावू लागते.




