मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले असून विद्यमान अध्यक्ष भाई जगताप यांना पदावरून दूर करण्यात आलं आहे. जगताप यांच्या जागी पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत एक पत्रक काढून पक्षाचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर होत असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशातच काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली असून भाई जगताप यांच्या जागी वर्षा गायकवाड यांच्या रुपाने पक्षातील महिला चेहऱ्याला संधी दिली आहे. तसंच गायकवाड यांच्या माध्यमातून शहरातील दलित मतदारांनाही आपल्याकडे खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.




