जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीदेखील उपस्थित आहेत. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे.
मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे.
आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं.
जालना येथे उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेट https://t.co/7Q1gW9aKAf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 14, 2023




