मुंबई : गृह विभागाकडून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली. अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील.
दिवाळी मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे :
- यावर्षी दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
- दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
- उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे कोरोनाचं संक्रमन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.
- कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.