मुंबई: फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे आता रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्रात फक्त परत आणले जाणार आहे तसेच त्यांची वरिष्ठ पदावर वर्णीही लागले अशी जोरदार चर्चा सुरु आहे. या संभाव्य निर्णयाबद्दल राज्यातील पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता. न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्यानंतर संबंधित प्रकरणाचा तपास पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावरील सर्व कलंक आता दूर झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मी शुक्ला यांनी मोहित कंबोज यांच्यासोबत सागर बंगल्यावर जाऊन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे दिवस पालटणार असल्याची चर्चा सुरु झाली होती.
काय होत नक्की प्रकरण?
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने ऐतिहासिक असे राजकीय नाट्य अनुभवले होते. शिवसेनेने भाजपला धक्का देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली होती. हे सर्व राजकीय नाट्य तब्बल ३६ दिवस सुरु होते. या काळात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप होता. गुप्तवार्ता विभागाने रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून टॅप केले होते. ज्या नेत्यांचे फोन टॅप करायचे आहेत, त्यांची बनावट नावं सांगून, हा सगळा उद्योग करण्यात आला होता. त्यामुळे रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या.
आरोप झाल्यानंतर रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये निघून गेल्या. परंतु, महाविकास आघाडी सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवले होते. या सगळ्या चौकशीला रश्मी शुक्ला यांनी अपेक्षित सहकार्य केले नव्हते. त्या चौकशीसाठी मुंबई यायला तयार नव्हत्या. मी पत्रव्यवहाराद्वारे उत्तरे देईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर सायबर पोलिसांचे पथक हैदराबादलाही गेले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरील फोन टॅपिंगचे गंडांतर दूर झाले आहे. एवढेच नव्हे तर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्रात ‘घरवापसी’ होण्याची दाट शक्यता आहे.




