ठाणे : ठाण्यात आणखी एका व्यापाऱ्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कळवा येथील रेती बंदर खाडीत आढळला. मनसुख हिरण यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत सापडला होता, तिथून जवळच ठाण्यातील एका सराफाचा मृतदेह आढळला. भरत जैन असे या सराफाचे नाव आहे. त्यांना सहा दिवसांपूर्वी त्यांच्या चरई येथील दगडी शाळेजवळ असलेल्या बी. के. ज्वेलर्समधून अज्ञात व्यक्तीने गाडीत बसवून नेले होते. त्यानंतर ते परत घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली होती. आज त्यांचा मृतदेह आढळल्याने त्यांच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत जैन ठाण्याच्या मखमली तलाव परिसरात राहत होते. 14 ऑगस्ट रोजी (शनिवार) त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसवून नेले. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले होते कि एक तासात परत येतो. पण ते त्यानंतर घरी परतलेच नाहीत. दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीने पोलीस स्थानकात ते हरवल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी शोध घेत एका टॅक्सी चालकाला चौकशीसाठी बोलावले होते. या टॅक्सीचालका सोबत आणि त्या अज्ञात व्यक्ती बरोबर भरत जैन तलाव पाळी परिसरात 8 तास फेऱ्या मारत होते. यापुढे नेमके काय झाले? भरत यांचा मृत्यू कसा झाला? याचा शोध आता नौपाडा पोलीस घेत आहेत. तसेच त्याच्या दुकानातील 10 ते 15 किलो चांदीही गायब झाल्याचा आरोप जैन यांचे मोठे बंधू सुनील जैन यांनी केला आहे.
आज मुंब्रा रेतीबंदर, गणेश विसर्जन घाट याठिकाणी खाडी किनारी एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये दिली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि कळवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जैन कुटुंबीयही घटनास्थळी दाखल झाले. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. मात्र, त्याच्या अंगावरील कपडे भरत यांचेच असल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केल्याचे सुनील जैन यांनी सांगितले. तसेच या कपड्यांच्या खिशामध्ये भरत यांच्या दुचाकीची चावी आढळल्याने हा मृतदेह भरत यांचा असल्याचे स्पष्ट होते, असे सुनील यांनी सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस स्थानकात अपहरण आणि खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.




