बारामती : कधी कधी भांडणाचे किती भयंकर परिणाम होऊ शकतात, हे दाखवणारी एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून महिलेने आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीत साठलेल्या पाण्यात उडी घेतली. हा प्रकार पाहून आईला वाचवण्यासाठी दोन चिमुकल्या मुलांनी देखील पाण्यात उडी घेतली, परंतु, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आईला मात्र पतीने सुखरूप बाहेर काढले. बारामतीमधील पिंपळी येथे शनिवारी (२९ मे) पहाटे तीन च्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीच्या भांडणातून ही घटना घडली आहे. पहाटे बारामती तालुक्यातील पिंपळी येथील अतुल सूर्यवंशी आणि अंजली सूर्यवंशी या पती-पत्नी मध्ये भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात ही महिला आत्महत्या करण्यासाठी गावाबाहेर असणाऱ्या खाणीच्या पाण्याजवळ गेली आणि तिने खाणीच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यांची दोन मुले दिव्या (वय 4) व शौर्य (वय 2) हेदेखील आईच्या पाठोपाठ आले होते. आईने पाण्यात उडी घेतल्याचं पाहताच आईला वाचवण्यासाठी या दोन्ही मुलांनी एकापाठोपाठ पाण्यात उडी घेतली. याचवेळी पती अतुल यांनी पाण्यात उडी घेत पत्नीला पाण्याबाहेर काढले आणि वाचवले. पण यादरम्यान, त्यांच्या दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुर्दैवी घटनेत दोन चिमुकल्यांचा झालेला शेवट मन हेलावून टाकणारा आहे.




