मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दरम्यान, ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती दर्शवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होत आहे, अशावेळी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे सरकारसमोर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा उभा ठाकला आहे. सह्याद्रीवरील मंत्रीमंडळ बैठकीनंतर याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदावर चर्चा करून निर्णय घेऊ, असं महाविकास आघाडीतील नेते म्हणत असताना आता विजय वडेट्टीवार यांनी विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क असल्याचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले कि, “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि आताही विधानसभा अध्यक्ष पदावर काँग्रेसचाच हक्क आहे. तीन पक्ष मिळून सरकार बनवलं, तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेऊ , काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद याबाबत तिन्ही पक्ष बसून निर्णय घेणार , सरकार स्थिर आहे, आमचा किमान समान कार्यक्रम ठरलाय , प्रदेशाध्यक्षांना मंत्री पद द्यायचं का? याबाबत हायकमांड निर्णय घेणार.




