मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी गरीब कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा होतात. या योजनेला २०१४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती आणि जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.
जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत, महिलांच्या खात्यात पाच हफ्त्यांचे पैसे जमा झाले. आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हफ्ता अॅडव्हान्स जमा करण्यात आला होता, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात एकाच वेळी ३,००० रुपये जमा झाले. आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार, याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
महायुतीच्या नेत्यांनी राज्यात पुन्हा सत्तेत आल्यावर योजनेत आणखी वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, महिलांच्या खात्यात दर महिन्याला 2100 रुपये जमा होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये कधीपासून जमा होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की, यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल आणि ही योजना सुरूच राहील. त्यामुळे, पुढील वर्षी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं आहे. 35,788 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी दिली असून, त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 3050 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी रस्ते आणि पूल बांधणीसाठी 1500 कोटी, मोदी आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर 1400 कोटी रुपयांच्या तरतुदीसोबत अन्नपूर्णा योजनेसाठी मंजूर 514 कोटी रुपयांची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी सरकारचं दुहेरी गिफ्ट मानली जात आहे. यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारचा सकारात्मक पाऊल पुढे टाकला आहे.




