मुंबई : मराठी पत्रकारितेत संपादक म्हणून प्रयोगशील राहिलेले आणि होतकरूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक म्हणून सदा डुंबरे स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, माध्यमांच्या क्षेत्रातील बदलांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डुंबरे यांनी संपादक म्हणून प्रयोगशीलता जपली. त्यांनी अनेकांना लिहिते केले. लेखन आणि विषयांत नाविन्य धुंडाळण्याचा प्रवाह डुंबरे यांनी निर्माण केला. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिले. प्रयोगशील संपादक म्हणून त्यांचे पत्रकारितेतील योगदान सदैव स्मरणात राहील. ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे (वय ७२) यांचे करोनाने गुरुवारी निधन झाले. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून भौतिकशास्त्रातील पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभागातून पत्रकारितेतील पदवी घेतली. इंग्लंडच्या ‘थॉम्प्सन फाऊंडेशन’चा प्रगत पत्रकारितेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला होता. ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहात बातमीदार ते संपादक अशा विविध पदांवर काम करणारे डुंबरे ‘साप्ताहिक सकाळ’चे संपादक म्हणून सेवानिवृत्त झाले. राजकीय आणि सामाजिक घडामोडींबरोबरच विकास आणि पर्यावरण, भाषा आणि साहित्य या विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले होते.
महाराष्ट्रातील प्रागतिक विचारांच्या संस्था चळवळी आणि गट यांच्याशी डुंबरे यांचे घनिष्ठ नाते होते. ‘मिळून साऱ्या जणी’ मासिकाचे संचालन करणाऱ्या ‘निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘परिसर’ या संस्थांचे ते विश्वस्त होते. ‘आरसपानी’, ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘कर के देखो’ आणि ‘देणारं झाड’ या पुस्तकांचे लेखन करणाऱ्या डुंबरे यांनी अनिल अवचट यांच्यावरील ‘वेध अवलियाचा’ या पुस्तकाचे संपादन केले होते.