औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे हत्याकांड पहाटे पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात घडले आहे. अज्ञात हल्लेखोराने संभाजी निवारे यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला.
या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, ८ वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. सुदैवाने संभाजी निवारे यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. तो जखमी झाला असून त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे शेजाऱ्यांना संभाजी निवारे यांच्या घराचे दार उघडे दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी घरात पाहिले असता तिघांचे मृतदेह आढळून आले.
शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संभाजी निवारे शुक्रवारी शहरातील बाजारात जाऊन नात्यातल्या लग्नासाठी मोठी खरेदी करुन आले होते. मौल्यवान वस्तू लुटण्याच्या उद्देशाने हल्ला झाल्याची शक्यता आहे. पोलीस या हत्येमागच्या कारणाचा अधिक तपास करत आहेत.