Liquor Ban in Panoḍi Village
अहिल्यानगर महाराष्ट्र

पानोड़ी ग्रामसभेचा ऐतिहासिक निर्णय, महिलांच्या संघर्षानंतर दारूबंदीचा ठराव मंजूर

पानोड़ी (ता. संगमनेर) : पानोड़ी गावातील महिलांनी दारूच्या दुष्परिणामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, ग्रामसभेत एकमताने दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. यामुळे गावातील मद्यविक्रीवर बंदी येणार आहे, आणि दारूच्या विळख्यात अडकलेल्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या काही वर्षांपासून गावात अवैध मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होती, ज्यामुळे अनेक कुटुंबांवर विपरीत परिणाम होत होते. घरातील पुरुष मद्याच्या आहारी जात असल्याने घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. याचा महिलांच्या आणि मुलांच्या जीवनावर मोठा परिणाम होत होता. तसेच कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेवर देखील परिणाम होत होता. याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नव्हती. अखेर गावातील महिलांनी एकत्र येत या समस्येविरोधात आवाज उठवला. गावातील अनेक महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त करत ‘दारूमुळे आमच्या प्रपंचाचे अक्षरशः वाटोळे झाले हो! आता पुरे झाले, आम्हाला दारूमुक्त गाव हवा!’ अशी आर्त हाक दिली.

महिलांची आक्रमक भूमिका :
महिलांनी गावातील वाढलेल्या वाद-विवादाच्या घटनांमुळे आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन दारूबंदी करण्यासाठी अर्ज दिला आणि दारू विक्री थांबवण्याची मागणी केली. त्यानंतर मंगळवारी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. या ग्रामसभेत गावात पूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांपासून जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. गावातील महिलांनी पुढाकार घेत दारूबंदीची जोरदार मागणी करत हा विषय प्रशासनापर्यंत पोहोचवला.

ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव :
अखेर महिलांच्या मागणीला पाठिंबा देत गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येत ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर केला. या निर्णयानुसार, गावात कुठेही मद्यविक्री आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. तसेच, अवैध दारू विक्री करणाऱ्यांची नावे प्रशासनाकडे देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

या ग्रामसभेला सरपंच गणपत हजारे, उपसरपंच विक्रम थोरात, विनायक थोरात, रावसाहेब घुगे, गोपाळ थोरात, बबन कराड, बाळासाहेब कदम, नानासाहेब कदम, रंगनाथ जाधव, महादू खेडकर, कैलास कराड, बाळू नागरे, रंगनाथ मुढे, संजय जाधव, मधुकर कदम, सुदाम सांगळे, ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणे तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मान्यवर, गावकरी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

दारूमुळे गावातील सामाजिक आणि आर्थिक स्थिती ढासळत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. महिलांच्या संघटित लढ्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून, गावात कायमस्वरूपी दारूबंदी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पानोड़ी गाव आता दारूमुक्त गाव होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत