अहमदनगर : बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सागर बबन लष्करे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) व किरण बाबासाहेब ठुबे (रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
बारावीचा पेपर देऊन पारनेर तालुक्यातील दोन विद्यार्थी आष्टी येथून त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलच्या समोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.




