२९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आहेत. काही वर्षांपूर्वी शिकार आणि इतर गोष्टींमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत वाघांची संख्या कमी व्हायला लागली होती. मात्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत वाघांचं प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष दिलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या दिवशी राज्यातील जनतेला व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज आहे.महाराष्ट्राची वनसंपत्ती ही मोठी आहे. ज्या जंगलात वाघ असतो तिकडचं निसर्गचक्र हे उत्तम मानलं जातं. त्यामुळे निसर्गाचं संतुलन कायम राखण्यासाठी वाघांची जोपासना करणं ही काळाची गरज आहे. सरकारसोबत नागरिकांचीही ही जबाबदारी असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.




