मुंबई : प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांनी ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लखनऊमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, मिथिलेश चतुर्वेदी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी लखनऊला गेले होते, जेणेकरून ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊ शकतील.
मिथिलेश यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मिथिलेश चतुर्वेदी यांनी गेली अनेक दशके मनोरंजन क्षेत्रात काम केले. त्यांनी हृतिक रोशनसोबत कोई मिल गया, सनी देओलसोबत गदर एक प्रेम कथा, सत्या, बंटी और बबली, क्रिश, ताल, रेडी, अशोका आणि फिजा यासह काही मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते अनेक जाहिराती आणि टीव्ही शो देखील दिसले होते. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्यासोबत गुलाबो सिताबो हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
मिथिलेश चतुर्वेदी यांनी 1997 मध्ये ‘भाई भाई’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ते ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा भाग होते. या चित्रपटांमध्ये साकारलेल्या वेगवेगळ्या पात्रांमुळे मिथिलेश चतुर्वेदी यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 2020 मध्ये ‘स्कॅम 1992’ या वेब सीरिजमध्ये ते दिसले होते. मिथिलेश चतुर्वेदी सध्या Banchhada नावाच्या चित्रपटात काम करत होते.




