अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे अडचणीत आले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये केबीसीला टीआरपी मिळत नाहीये. त्यातच आता या कार्यक्रमाशी संबंधित ७ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुजफ्फरपूर कोर्टात अमिताभ बच्चन यांच्यासह सात जणांविरोधात धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सिकंदरपूरमधील रहिवासी असणारे आचार्य चंद्रकिशोर पराशर यांनी गुरुवारी सीजेएम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, क्विझ शोचे दिग्दर्शक अरुणेश कुमार, राहुल वर्मा, टीव्ही चॅनेलचे अध्यक्ष मनजीत सिंग, सीईओ एनपी सिंग आणि सहभागी स्पर्धक बेजवाड़ा विल्सन या सात जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
३० ऑक्टोबर रोजी केबीसीच्या सीझन १२ मधील एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला होता की, २५ सप्टेंबर १९२७ रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथातील पानं जाळली होती? या प्रश्नाच्या उत्तरासाठी A. विष्णुपुराण, B. भागवत गीता, C. ऋगवेद D. मनुस्मृति असे चार पर्याय देण्यात आले होते. हा प्रश्न आणि त्याकरता देण्यात आलेले उत्तरासाठीचे पर्याय आक्षेपार्ह होते. हा प्रश्न जाणुनबुजून विचारून हिंदू भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप चंद्रकिशोर यांनी केला आहे. पुढील सुनावणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.