मुंबई : रिझव्र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झाला असून सर्वच प्रकारची कर्ज महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज बुधवारी ४ मे २०२२ रोजी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
रेपो रेट वाढण्याचे एक कारण म्हणजे देशात महागाई प्रचंड वाढली आहे. कारण भारतातील किरकोळ महागाई मार्चमध्ये 17 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे, ज्यामुळे अन्न आणि उत्पादित वस्तूंच्या किमतींमध्ये अपेक्षेपेक्षा तीव्र वाढ झाली आहे, असे अधिकृत आकडेवारी दर्शवते. जे आता सलग तिसऱ्या महिन्यात RBI च्या 6% च्या सहनशीलतेच्या वर आहे. दरम्यान, ८ एप्रिल २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेने पतधोरण स्थिर ठेवले होते. मात्र महागाईवर बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले होते.
पेट्रोल-डिझेल, सीएनजी, स्वयंपाकाचा गॅस, दूध, भाजीपाला, मांस, अंडी यासारखे खाद्यान्न तसेच दैनंदीन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईने उसळी घेतली आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के इतका वाढला आहे. महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. त्याआधीच्या फेब्रुवारी महिन्यात तो १३.११ टक्के इतका होता.




