राजस्थान : उदयपूरमध्ये एका व्यक्तीच्या निर्घृण हत्येनंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्याने दुकाने बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलीस हाय अलर्टवर असून शांतता राखण्यासाठी जिल्ह्यात पुढील २४ तास इंटरनेट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दोन हल्लेखोरांपैकी एकाने कन्हैया लालवर धारदार शस्त्राने हल्ला केला तर दुसऱ्याने त्याच्या मोबाइल फोनवर हत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर लगेचच त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आणि हत्येची कबुली दिली. हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन देत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.




