दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा 16 जानेवारीपासून सुरू होत आहे. कोरोना संकट आता थांबण्याच्या मार्गावर आहे. तशी माहितीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच कोरोनाविरुद्धच्या लढाईतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं आहे. या लसीकरण मोहीमेत डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि सफाई कामगारांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
On 16th January, India takes a landmark step forward in fighting COVID-19. Starting that day, India’s nation-wide vaccination drive begins. Priority will be given to our brave doctors, healthcare workers, frontline workers including Safai Karamcharis. https://t.co/P5Arw64wVt
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या लोकांना लस दिली जाईल. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताने कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.
कोरोनाची लस घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागणार आहे. या बुकिंगनंतर तुम्हाला तुमच्या घराजवळचा बूथ दिला जाईल. यासाठी सरकारतर्फे लसीकरण अभियान सुरु केलं जाईल. यामध्ये दर 2 किलोमीटरच्या अंतरावर लसीकरणं बूथ उभारले जातील. बुकिंग केल्यानंतर तुम्हाला लसीकरणाची वेळ आणि बूथचा पत्ता SMS केला जाईल. यानुसार तुम्ही लसीकरण बूथवर जाऊन लस घेऊ शकता.
लसीकरण बूथवर 3 खोल्या असणार आहेत, पहिल्या खोलीत तुमची सगळी कागदपत्र तपासली जातील. ज्यामध्ये तुमचं ओळखपत्र आणि इतर कागदपत्र असतील. एकाच व्यक्तीनं दोनदा लस घेऊ नये, आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद करता यावी यासाठी ही नोंदणी असेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या खोलीत तुम्हाला लस दिली जाईल. लस दिल्यानंतर तुम्हाला देखरेखीखाली ठेवलं जाईल. जिथं तुमच्यावर 30 मिनिटांपर्यंत लक्ष ठेवलं जाईल. लसीचा काही साईड इफेक्ट झालाच तर तातडीनं वैद्यकीय उपचार दिले जातील, नाहीतर तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पहिल्या लसीनंतर पुन्हा 28 दिवसांनी दुसरी लस घेण्यासाठी यावं लागणार आहे.




