औरंगाबाद : प्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार भारत काळे यांचे रविवारी दुपारी चारच्या सुमारास करोनाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. गेल्या पंधरा दिवसांपासून ते करोनाने आजारी होते. औरंगाबाद येथे उपचार चालू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत काळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक होते तसेच ते बाराशिव शिक्षण प्रसारक मंडळ, परभणी येथे कार्यरत होते. ‘ऐसे कुणबी भूपाळ’, ‘दीक्षा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. काळे यांच्या निधनाने सर्व मित्र, परिचित आणि साहित्य वर्तुळातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.भारत काळे हे काळाचा वेध घेऊन लेखन करणारे कादंबरीकार आहेत. त्यांनी केलेली मानसशास्त्रीय अंगाची मांडणी ही त्यांच्यातल्या वेगळेपणाची ओळख करून देणारी आहे. त्यांनी मानवी मनाचे अनेक धागे वाचकांच्या समोर आपल्या साहित्यातून मांडले आहेत.




