मुंबई : अन्न आणि औषध विभाग मार्फत मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेने खाद्य तेल खरेदी करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन एफडीएतर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांना उत्तम दर्जाचे खाद्य पदार्थ मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून वारंवार विविध दुकानांवर छापेमारी करतात. गेल्या काही दिवसांपासून एफडीतर्फे छापेमारीचे सत्र सुरु केले आहेत. नुकतंच एफडीएतर्फे निकृष्ट आणि भेसळयुक्त दर्जाचे खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. यावेळी अन्न शिजवण्यासाठी गृहिणी जे तेल वापरतात, त्यातील सुमारे 50 टक्के तेल वापरण्यास योग्य नसून ते भेसळयुक्त होते. अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे.
एफडीए प्रशासनाने 30 अन्ननिरीक्षकांची विविध पथके स्थापन करून या उत्पादकांवर कारवाई केली आहे. या धाड सत्रात आठ उत्पादकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार कोटी 98 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यात शेंगदाणा, मोहरी, तीळ, सोयाबीन, सूर्यफूल, पामोलिन इत्यादी तेलांचे सुमारे 93 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. यापैकी 49 नमुने भेसळयुक्त असल्याचे स्पष्ट झाले.
एफडीएने स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सुट्या तेलाचे नमुने गोळा करून त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली होती. मात्र यात रंग मिसळलेलं किंवा दुसरे तेल मिक्स अल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे अनेक नामवंत कंपन्यांच्या तुलनेत हे तेल खूपच स्वस्त असल्यामुळे या भेसळयुक्त तेलाला झोपडपट्टी विभागात मोठय़ा प्रमाणात मागणी असते. मात्र हे तेल आरोग्याला अपायकारक असते.या खाद्यतेलात रंग मिसळलेला असतो.
ब्रॅंडेड कंपनीच्या उत्पादनांचीही पुढील टप्प्यात तपासणी करण्यात येणार आहे. तर हॉटेलमध्ये आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते कोणते तेल वापरतात तेही तपासले जाणार आहे. ही मोहिम फक्त मुंबई शहरात राबवली होती. मात्र याचे स्वरूप वाढवून संपूर्ण राज्यात करण्यात ही मोहिम राबवली जाणार आहे. तुम्हाला कोणते तेल बनावट असल्याची शंका आली, तर त्वरीत एफडीएशी संपर्क साधून तुम्हीही तपासणी करू शकता.




