पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजील उस्मानी विरोधात पुणे पोलिसांनी FIR दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत उस्मानी याने प्रक्षोक्षक भाषण करून भावना दुखावल्याप्रकरणी गावडे यांनी स्वारगेट पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार उस्मानीविरोधात भादंवि १५३ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतक भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात शरजील उस्मानीविरोधात तक्रार दाखल केली.
३० जानेवारी रोजी पुणे येथे एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याने आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ‘आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो’, अशाप्रकारची गंभीर विधाने त्याने केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. हा प्रकार चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, ही मला आशा आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
शरजील उस्मानी याने पुणे येथे दि. 30 जानेवारी 2021 रोजी एल्गार परिषदेत समस्त हिंदू समाजाबद्दल केलेले अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्य आणि त्याच्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करण्याची गरज, याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र @CMOMaharashtra pic.twitter.com/a0jNk6FEq0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 2, 2021




