जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रवादी पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलं असताना विजेचा धक्का बसल्याने रमेश घाईट यांचे निधन झाले. घाईट यांच्या निधनाने त्यांच्या जागेसाठी मतदान होणार की नाही, असा प्रश्न उपस्थिच होत आहे.
रमेश घाईट हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे ते उमेदवार होते. शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा धक्का लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, वडोदा ग्रामपंचायतीतील संबंधित जागेसाठी मतदान होणार की रद्द करावे लागणार, यासाठी तहसील विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.




