आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं. ते म्हणाले, आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये काळजी घेणं गरजेचे आहे.
मंदिरं कधी उघडणार? प्रार्थनास्थळं कधी उघडणार असा सवाल केला जात आहे. मंदिरं सुरु करताना पूर्ण काळजी घेतली जाईल. दिवाळीनंतर नियमावली करुन मंदिरं उघडणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मंदिरावरुन माझ्यावर टीका केली जाते. राज्यातील लोकांसाठी आपण मंदिरं उघडायला उशीर करत आहोत. मात्र लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील असं मुख्यमंत्री म्हणाले.
मंदिर कधी उघडणार? असा सवाल करत माझ्यावर टीका होतेय, करू द्या. तुमच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी टीका सहन करायला मी तयार आहे. टीका करणारे 4 दिवस करतील परंतु उद्या गंडांतर आलं तर? माझ्यावर जबाबदारी आहे. मंदिर उघडणारच आहोत, परंतु त्यासाठी नियमावली बनवत आहोत. मंदिरात साधारण ज्येष्ठ नागरिक जातात, त्यांनाच तर आपण वाचवत आलो आहोत. प्रत्येक धर्मस्थळात आपण तल्लीन होऊन प्रार्थना करतो, परंतु त्यामुळे संक्रमण वाढायला नको, असं मुख्यमंत्री म्हणाले.




