अहिल्यानगर : संगमनेर शहरातील अवैध कत्तलखाने व इतर गुन्हेगारी कारवायांबाबत स्थानिक पोलिस अधिकारी शासनाला खोटी माहिती देत असल्याचा गंभीर आरोप आमदार अमोल खताळ यांनी राज्य विधिमंडळात केला आहे. विधिमंडळात लक्षवेधी सूचनेद्वारे बोलताना आमदार खताळ यांनी सांगितले की, संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक यांनी गोवंश हत्याबंदी कायद्यातील कारवाई बाबत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना दिली आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात अद्याप एमपीडीए अंतर्गत एकाही कत्तलखाना चालकावर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.
याप्रकरणी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना खातरजमा न केल्याबद्दल ताकीद देण्याची मागणी आमदार खताळ यांनी केली.
अवैध पदार्थांची खुलेआम विक्री
शहरातील महाविद्यालये, रुग्णालये, धार्मिकस्थळे आणि झोपडपट्टी परिसरात गुटखा, मादक पदार्थ, गांजा, अफू, नशेच्या गोळ्या व सिगारेट यांची खुलेआम विक्री होत असून, अनेक तरुण व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
जुगार आणि दारूचे अड्डे फोफावत आहेत
संगमनेर परिसरात मटका व ऑनलाईन जुगाराचे सत्र वाढले असून, बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर या जाळ्यात अडकले आहेत. तसेच गावठी दारूची निर्मिती, वाहतूक व विक्रीही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात मांडली.
पोलिसांकडून दुर्लक्ष
अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून गंभीर दुर्लक्ष होत असून, कारवाईची भाषा फक्त कागदावर मर्यादित राहिली असल्याचा आरोप आमदार खताळ यांनी केला.
याप्रकरणी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आमदार खताळ यांनी गृहमंत्र्यांचे लक्ष वेधले.




