नागपूर : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजी व्यक्त केली आहे. ”जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे. नव्यांना संधीसाठी ज्येष्ठांना डावललं जातंय. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय आणि फेकलं काय, मला काही फरक पडत नाही. असं मंत्रिपद कितीवेळा आलं आणि कितीवेळा गेलं, पण मी कधी संपलेलो नाहीय. पण मी नाराज आहे. ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा. ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला यश मिळालं”, असं म्हणत छगन भुजबळांनी आपली नाराजी स्पष्ट जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मात्र त्यासाठी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदूराव यांनी हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे जाऊन भुजबळ यांची भेट घेतली.




