रायगड : खालापूर तालु्क्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री १०.३० – ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत गावातील जवळपास ५० घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ५ मृतदेह सापडले आहेत. ढिगाऱ्याखाली १०० पेक्षा अधिक जण अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
इर्शाळवाडी आदिवासीबहुल गाव असून गाव डोंगरावर वसलेलं आहे. रात्री उशिरा गावावर दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच रसायनीला राहत असलेल्या तरुणांचा एक गट मदतीसाठी पोहोचला. रसायनीपासून इर्शाळवाडी ३ ते ४ किलोमीटर दूर आहे. गावात जायला लहानशी पायवाट आहे. पक्का रस्ता नाही. तिथे मोठ्या मशीन्स, वाहनं जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असून साधनांचा अभाव आहे. रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस होता. त्यामुळे मदतकार्यात बरेच अडथळे येत आहेत. येथील घरं १० फूट ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. हा ढिगारा सहजासहजी उपसता येणार नाही. त्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक आहे.
रात्री बाराच्या सुमारास स्थानिक तरुण मदतकार्यासाठी जात असताना त्यांच्या सोबतीला अग्निशमन दलाचे जवानही होते. दरम्यान, डोंगरावर चढत असताना बेलापूरहून आलेले अग्निशमन दलाचे अधिकारी अचानक कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला.




