नवी दिल्ली : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मानहानीच्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. यासोबतच राहुल गांधी यांनी केलेली शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी ‘मोदी आडनाव’बाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. चार वर्षांनंतर 23 मार्च रोजी सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
राहुल यांचे संसद सदस्यत्व रद्द
यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत राहुल यांचे संसद सदस्यत्व लोकसभा सचिवालयाने रद्द केले. राहुल केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यात अशी तरतूद आहे की एखाद्या प्रकरणात खासदार आणि आमदाराला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाते. एवढेच नाही तर शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते सहा वर्षे निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरतात.
राहुल यांनी केल्या होत्या दोन याचिका
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल यांनी २ एप्रिल रोजी सुरत सत्र न्यायालयात धाव घेतली होती. राहुल यांनी दोन याचिका दाखल केल्या आहेत. पहिल्या अर्जात शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती, तर दुसऱ्या अर्जात अपील निकाली निघेपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.
राहुल यांच्याकडे आता कोणता पर्याय आहे?
राहुल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मात्र, सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्यासमोर अजूनही खुला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास त्यांचे सदस्यत्व बहाल केले जाऊ शकते.
काय आहे प्रकरण?
राहुल गांधी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे एका निवडणूक सभेत म्हणाले होते, “नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी, सर्वांचे मोदी हे आडनाव का आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” भाजपचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्या या विधानाबाबत कलम 499, 500 अंतर्गत त्यांच्यावर फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. 2019 च्या निवडणूक रॅलीत राहुल यांनी सर्व चोरांचे मोदी हे आडनाव का आहे, असे म्हणत संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली, असा आरोप भाजप आमदाराने आपल्या तक्रारीत केला होता.




