नाशिक : मुंबईहून समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना भरधाव इन्होवा कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली. सिन्नरजवळील खंबाळे शिवारात झालेल्या या भीषण अपघातात शिर्डी येथील चौघेजण ठार झाले. त्यात तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
सिन्नर हद्दीतील हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर खंबाळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजूकडे जाणारी अति वेगात असलेल्या इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. इनोव्हा कारचे दरवाजे कटरने कापून मृतांना आणि जखमींना कारमधून बाहेर काढले. मृत व्यक्तींना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने उपचारासाठी रवाना करण्यात आले. यातील काही जखमी शिर्डी येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तर काही नाशिक येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्व शिर्डी येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण हज यात्रेकरूंना सोडून शिर्डीला परतत होते.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्ती :
- रज्जाक अहमद शेख (वय ५५)
- सत्तार शेखलाल शेख (वय ६५)
- सुलताना सत्तार शेख (वय ५०)
- फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गंभीर जखमी :
- जुबेर रज्जाक शेख (वय ३५)
- मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५)
- अझर बालन शेख (वय २५)
- मुस्कान अजहर शेख (वय २२)




