पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट दिली. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या शेजारी असलेल्या गावांचा मनपात समावेश करण्यात आला. याठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, हे प्रश्न सुटायला हवेत. एकूणच या गावातील राहणीमानाचा दर्जा आता उंचवायला हवा, शहरीकरणाचा वेग वाढायला हवा, परंतु अनेक वर्ष होऊनही पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांना कोणत्याही सुविधा अजून पुरवल्या गेलेल्या नाहीत. नऱ्हेसह पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट सर्वच गावे मूलभूत प्रश्नसाठी संघर्ष करत आहेत. याठिकाणी नियोजनबध्द विकास होणे शक्य आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे गावातील पारी टॉवर्स सोसायटीला भेट देऊन येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक हे त्यांना भेडसावणारे प्रश्न पारी टॉवर्स मधील सदस्यांनी मांडले. सुप्रिया सुळे यांनी सर्वांना विश्वास दिला कि सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर झाल्यास त्वरित नगरसेवक नेमून कामांना गती देता येईल. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला ग्रामीणचे अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, भुपेंद्र मोरे, भावना पाटील, स्वाती पोकळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पारी टॉवर्समधील कमिटी सदस्य डॉ. सोमनाथ गिते, निरंजन माळवदकर, शरद शिंदे, प्राजक्ता रणदिवे, रोहन कौसले, गौरीहर अवधूत, दिनेश तांबे, रामचंद्र येलपुरे, अभिषेक कोल्लम, स्वप्नील घन, शुभंकर जोशी, दत्तात्रय पडार, प्रविण कुमकर, अतुल यादव, प्रेम निकुंभ, प्रिती वाळवेकर, प्राजक्ता तट्टू तसेच पारी टॉवर्स सदस्य उपस्थित होते.
पारी टॉवर्स सोसायटीतील सदस्यांनी मांडलेल्या समस्या :
- नऱ्हेकडून धायरीला जाणाऱ्या रस्त्यावर खूप अतिक्रमण असल्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होते, त्यासाठी रस्त्याचे अतिक्रमण हटवून रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे.
- नऱ्हेकडून धायरी फाट्याकडे, तसेच नवले ब्रिज कडे जाणारा रस्ता खूपच अरुंद असल्यामुळे तिथे देखील रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता आहे.
- पारी चौकात सीएनजी पंप असल्यामुळे तिथे नेहमी वाहनांची रहदारी सुरू राहते, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवते, त्यामुळे त्या सीएनजी पंपाचे स्थलांतर होणे आवश्यक आहे.
- पारी चौकात डीपी असल्यामुळे तिथे खूपच अरुंद रस्ता आणि गर्दी झालेली आहे, त्यामुळे ती तेथून स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे.
- पारी चौकातून धायरीकडे जाताना पुढे कचरा प्रोसेसिंग युनिट आहे, तिथून खूपच जास्त दुर्गंधी येते आणि ते आरोग्यासाठी खूप घातक आहे, असे डॉक्टर बोलत आहेत. सोबत डॉक्टरचे पत्र जोडत आहे. त्याचेही स्थलांतर आवश्यक आहे.
- पारी टॉवरच्या आजूबाजूला कंपन्या आहेत, तिथून रात्रंदिवस आवाज येत असतो, त्या आवाजाचा परिसरातील सर्वांनाच खूप त्रास होतो, त्यासाठी देखील आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- ‘पारी’तर्फे पारी टॉवर्सच्या उत्तरेस महानगरपालिकेला जागा देण्यात आली आहे, त्या जागेचा योग्य वापर केला जावा, तिथे वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसाठी बाग तयार केली किंवा ग्रंथालय उभारण्यात आले तर त्या जागेचा फारच सुयोग्य वापर होईल.
- या समस्यांमुळे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण या समस्या तीव्र होत आहेत, त्यामुळे त्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
- नऱ्हेकडून धायरी फाट्याकडे जाताना वेंकटेश शर्विल सोसायटीसमोर देशी दारूचे दुकान आहे. त्याचा परिसरातील नागरिकांना तसेच महिलांना खूप त्रास होतो, आपणास विनंती आहे की त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा.
- नऱ्हेतील संपूर्ण परिसरात पिण्याच्या पाण्याची फार मोठी समस्या आहे, त्यावर ठोस उपाययोजना करावी.
- पारी टॉवर्स परिसरात जवळपास कोठेही बस स्टॉप नाही. त्याबाबत काहीतरी उपाययोजना करावी ही विनंती.
- पाऊस पडल्यानंतर पारी चौकात खूप जास्त पाणी साठते, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी काहीतरी उपाययोजना करणे फार आवश्यक आहे.




