रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींमध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी कट कारस्थान करून तिन्ही आरोपींनी स्वप्नाली यांना जाळून मारलं. स्वप्नाली सावंत आणि त्यांचा पती दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. एकमेकांशी फारसे पटत नव्हते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पण, या हत्येमागचं नेमक कारण अद्याप समजू शलकेले नाही. या प्रकरणात शहर पोलिसांनी या ३ जणांना आज सकाळी अटक केली आहे.
स्वप्नाली सावंत या दिनांक १ सप्टेंबर पासून त्यांच्या मिऱ्या येथील घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच शहर पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान, रत्नागिरी पोलिस गेले ८ दिवस कसून तपास करत होते. यामध्ये डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली होती. संशयित आरोपींनी स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्यानंतर राख समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रत्नागिरी शहर पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत या तपासात यश मिळवले आहे.




