सांगली : राज्यावर सध्या संकटांची मालिका कोसळत आहे. यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढणार असा मला आत्मविश्वास आहे. तातडीची मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे पॅकेज केवळ जाहीर करण्याचे थोतांड मला जमत नाही. लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व सरकार करणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिलवडी येथील पूरग्रस्तांना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी अकराच्या सुमारास भिलवडी येथे पोहोचले. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून पुराने झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. परिसरातील पूरग्रस्तांनी मागण्यांचे प्रातिनिधिक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले.
भिलवडी पूरग्रस्तांच्या मागण्या :
- पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावे.
- सोसायटींकडून घेतलेले पीक कर्ज माफ करावे.
- लाईट बिल माफ करावे.
- नदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधावी.
- नदीवर नवीन पूल बांधावा.
- व्यापारी व्यवसायिकांना नुकसानभरपाई मिळावी
- पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भिलवडी येथे बोलताने म्हणाले की, राज्यावर सध्या संकटांची मालिका कोसळत आहे. यातून आपण यशस्वीपणे मार्ग काढणार असा मला आत्मविश्वास आहे. तातडीची मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. हजारो कोटी रुपयांचे पॅकेज केवळ जाहीर करण्याचे थोतांड मला जमत नाही. लवकरच तातडीची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल. काही ठिकाणी कायमस्वरूपी उपायांची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. वारंवार पुराचा सामना करावा लागणाऱ्या लोकांना पुनर्वसनाची तयारी ठेवायला लागेल. यासाठी मला तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. सरकार तुमच्या हिताचे निर्णय घेईल. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जे जे शक्य आहे ते ते सर्व सरकार करणार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भिलवडी येथे पोचल्यानंतर बाजारपेठ परिसरात पूरग्रस्तांशी संवाद साधताना पुढील मुद्दे मांडले; pic.twitter.com/11jRN5lgEQ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021




