रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे राजापुर येथील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. राजापूर तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे शहरात पूर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून तळकोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुना नदीची पाण्याची पातळी वाढली तर मुंबई-गोवा महामार्ग हा अवजड वाहतूकीसाठी बंद केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. राजापूर येथील मुंबई-गोवा महामार्गावर ब्रिटिशकालीन ब्रिजवर राजापूर तहसिलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष जमिर खलिपे, मुख्यधिकारी देवांनंद ढेकळे, स्थानिक नगरसेवक सुभाष बंड्या बाकाळकर, राजापूरचे तलाठी कोकरे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, पुढचे ३ ते ४ दिवस हे कोकणासाठी धोक्याचे असून अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्य असेल तरच घराबाहेर पडावं, असं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात पाणी साचले आहे. नद्यांचीही पाणी पातळी वाढली आहे. हवामान विभागाकडून तळकोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.




