मुंबई : राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेसंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्र सरकारनं लसीच्या आयातीसाठी धोरण ठरवावं, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे आशा वर्कर्सना यापुढे कोरोना चाचणी करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील म्युकर मायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात मंत्रालयात महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत सरकारकडून या आजाराबाबत उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.
टोपे पुढे बोलताना म्हणाले की, “राज्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने याला नोटीफाईड आजार घोषित केलं आहे. म्हणजे, प्रत्येक रुग्णाची नोंद केली जाणार आहे. रुग्ण आणि त्यांच्याबाबतची माहिती शासनाला देणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे या रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. म्युकरमायकोसिसच्या एम्फोटेरेसिन इंजेक्शनचं नियंत्रण केंद्र सरकारनं केलेलं आहे. केंद्र सरकार आपल्याला जेवढा कोटा देईल, त्याप्रमाणे आपण प्रत्येक जिल्ह्यात त्याचे वाटप करतो. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत म्युकर मायकोसिस आजाराचे उपचार मोफत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बजेटमधून 30 कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद करण्यात आला आहे. या आजारावरील उपचारांसाठी 131 रुग्णालयं नोटीफाइड केलेली आहेत. 2200 पैकी 1007 रुग्ण महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर मोफत उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे या आजारावर खाजगी रुग्णालयात उपचार मोफत किंवा कमी दरात करण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.”




