मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील भागात सतर्कता ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला.
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जास्त जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी चारही जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या.
लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, शनिवारी त्याचे तौत्के चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे १५ ते १७ मे दरम्यान
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या पावसाचा इशाराही आयएमडीने दिला आहे. अरबी समुद्रात शनिवारी सकाळी तौत्के चक्रीवादळ तयार होऊन पुढील २४ तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर-वायव्येकडे सरकणार असून, १७ मे रोजी रात्री ९ ते १२च्या दरम्यान ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहचण्याचा अंदाज आहे.
- तौत्के चक्रीवादळाचा प्रवास शनिवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचे केंद्र किनारपट्टीपासून सुमारे १५० ते २०० किलोमीटर समुद्रात राहणार असले, तरी केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा आणि पावसाच्या ढगांचा घेरा मध्य महाराष्ट्रापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ ते १७ मेदरम्यान कोकण, गोव्याची किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे ६२ ते ९१ किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे.
- या काळात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी जास्त ते अतिजास्त पावसाच्या सरीही कोसळू शकतात, असे आयएमडीने म्हटले आहे.
- चक्रीवादळाच्या प्रभावाखाली असलेल्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये ‘नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स’च्या (एनडीआरएफ) २४ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, आणखी २९ तुकड्यांना सज्ज ठेवण्यात आले आहे.




