पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले कि, “घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल. लॉकडाऊन केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून आम्ही आवाहन करत आहोत, तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झाला हे खरं आहे. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा.”
नवे नियम :
- खासगी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात ८० टक्के बेड घेतले होते, आता ५० टक्के बेड करोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- १ तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत.
- शाळा-महाविद्यालयं ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.
- मॉल, चित्रपटगृहांसाठी ५० टक्के उपस्थितीचा नियम असेल. सार्वजनिक बस वाहतूक सुरू राहील.
- लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक संख्या अजिबात नकोय. अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी असेल. हे सगळे निर्णय नाईलाजास्तव घ्यावे लागले आहेत.
- सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू राहतील, नंतर ते बंद असतील.




