देहरादुन : उत्तराखंड आणि हिमाचलमधील जंगलात लागलेली आग अनियंत्रित झाली आहे. आग आता जंगलातून रहिवासी भागाकडे सरकू लागली आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील 6 पर्वतरांगांची जंगले सतत जळत आहेत. गणखेत रांग, बैजनाथ रांग, धर्मघर रांग, पिंडारी या भागातील बहुतांश जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत. याच गणखेत वन परिक्षेत्रातील आग वस्तीपर्यंत पोहोचली असून तेथे 12 गोठ्यांसह शेकडो गवताचे ढीग जळून राख झाले आहेत.
घटनास्थळी दाखल झालेले जिल्हा प्रशासन, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन आणि वनविभाग आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आगीमुळे ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील सोलनमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बरोगपाठोपाठ आता कांदाघाट, केठलीघाट, कानोहची जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. आगीच्या ज्वाळा कित्येक किलोमीटरपर्यंत दिसत आहेत. आकाशात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. गेल्या तीन दिवसांत 200 हेक्टरहून अधिक जंगलाला आग लागली आहे. हिरवीगार जंगले जळून राख झाली आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची वनसंपदा आणि वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे.
अलीकडेच, 28 मार्च रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील पृथ्वीपुरा-बलेटा गावातील जंगलाच्या डोंगरावर आग लागली. काही वेळातच ही आग अनेक किलोमीटर परिसरात पसरली. आगीची माहिती मिळताच सिव्हिल डिफेन्सच्या अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या मदतीने आठ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.




