मुंबई : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. आता सी. पी. राधाकृष्णन यांची या पदावर नेमणूक झाली आहे.
काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी राज्याला नवे राज्यपाल दिले आहेत. राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात मोदींची लाट असतानाही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजीत राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.




