सीबीआयचे माजी संचालक व मणिपूर नागालँडचे माजी गव्हर्नर अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गेल्या काही दिवसांपासून अश्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली.
अश्वनी कुमार हे ऑगस्ट २००६ ते २००८ या कालावधीत हिमाचल प्रदेशचे डिजीपी होते. त्यानंतर त्यांना सीबीआयचे संचालक पद देण्यात आले. ऑगस्ट २००८ ते २०१० पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर मणिपूरचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत ते या पदावर होते.
हिमाचल प्रदेशचे डीजीपी म्हणून काम करताना त्यांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टींमध्ये सुधारणा केली. हिमाचल पोलीस ठाण्याचे डिजिटलीकरण तसेच पोलीस ठाण्यात कॉम्प्युटरचा उपयोग या सगळ्याची सुरुवात त्यांनी केली होती. अश्वनी कुमार हे डीजीपी असताना तक्रारींचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरु झालं. ज्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना पोलीस ठाण्यात चकरा मारण्याचा त्रास वाचला होता.
अश्वनी कुमार हे अत्यंत शालीन आणि गंभीर स्वभावाचे होते. ते कमी बोलत असत मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असे. सीबीआयचे संचालक म्हणून काम करताना त्यांच्या कार्यकाळात अनेक हायप्रोफाइल केसेस त्यावेळी सीबीआयकडे आल्या होत्या. एक धीरोदात्त आणि समस्यांची उकल करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी नैराश्याला कंटाळून आत्महत्या करणं हा आम्हा सगळ्यांसाठी धक्का आहे, असं शिमल्याचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी म्हटलं आहे.




