मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावण्यात आली होती. सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी चंदीगड विमानतळावर त्यांना थप्पड मारली होती. या प्रकरणावरून गेले काही दिवस प्रचंड चर्चा आहे. दरम्यान, कुलविंदर कौर यांना त्यांच्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नसल्याचा दावा त्यांचा भाऊ शेरसिंग महिवाल यांनी केला आहे. दी प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
कपूरथला येथील किसान मजदूर संघर्ष समितीचे संघटक सचिव महिवाल म्हणाले की, शेतकरी आंदोलनावरून कंगनाने केलेल्या व्यक्तव्यामुळे त्यांची बहिण नाराज होती. एका व्हिडिओ संदेशात महिवाल म्हणाले की, मी कौर यांची भेट घेतली आणि तिच्याशी या घटनेबद्दल चर्चा केली. तिला या घटनेचा कोणताही पश्चाताप नाही. त्यावेळी पंजाब सरकारने किंवा केंद्राने कंगनावर कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असे ते म्हणाले.
६ जून रोजी चंदीगढ विमानतळावरून दिल्लीला जात असताना नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत यांना एका अपमानजनक प्रसंगाचा सामना करावा लागला. विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता संबंधित महिला ही शेतकरी आंदोलनाशी निगडीत होती, असं समजलं. कंगना यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याचा राग मनात धरून कॉन्स्टेबलने त्यांच्या थोबाडीत मारली. दरम्यान, याप्रकरणी कुलविंदर कौर या महिलेला निलंबित करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.




