केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. निर्मला सीतारामन यांनी भांडवली गुंतवणूक वाढवून ५.५४ लाख कोटी रुपयांची केल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील टू टीयर आणि वन टीयर शहरांच्या आजूबाजूच्या भागामध्ये या मेट्रोचं जाळं उभारलं जाणार आहे. यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या विशेष निधीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचाही उल्लेख आहे. नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं काम होणार असून नाशिकमध्येही मेट्रो येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
भारतामध्ये मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी विशेष तरतूद करत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सीतारामन यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमधील शहरांसाठी मेट्रोचं काम करण्याच्या दृष्टीने निधी कशापद्धतीने देण्यात येणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रोचं काम होणार असून यासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
बंगळुरु आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांनाही मेट्रोची सेवा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. बंगळुरुमधील मेट्रोचा विस्तार करण्यासाठी १४ हजार ७८८ रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या पैशांमधून बंगळुरु मेट्रोचं जाळं ५८.१९ किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. याचप्रमाणे चेन्नईमध्येही मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाचं काम केलं जाणार असून हा मार्ग ११८.९ किलोमीटरचा असणार आहे. यासाठी ६३ हजार २४० रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे :
- यावर्षी 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचं आरोग्य बजेट.
- पंतप्रधान आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेसाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद.
- वेगवेगळ्या नव्या आरोग्य आणि कल्याण योजनांसाठी 64 हजार कोटी रुपयांची तरतूद.
- कोविड लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद.
- डीएफआयसाठी 3 वर्षांकरता 2 लाख कोटींची तरतूद.
- देशभरात 7 मेगा इन्व्हेस्टमेंट पार्क उभारणार
- 15 वर्ष जुन्या वाहनांसाठी स्क्रॅपिंग पॉलिसी.
- कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1 लाख 78 हजार कोटींचा निधी.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये गॅस पाईपलाईनचा विस्तार करणार.
- मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींचा निधी.
- रेल्वेसाठी 1 लाख 10 हजार 55 कोटींचा विक्रमी निधी.
- मेट्रो शहरात मेट्रो रेल्वेचं जाळं उभारणार.
- सार्वजनिक वाहतुकीतल्या बसेसची सुधारणा करण्यासाठी 18 हजार कोटी.
- नाशिक मेट्रोसाठी 2 लाख कोटी तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची तरतूद. महाराष्ट्रासाठी बजेटमधील सर्वात मोठी घोषणा.




